करमाळा(दि.१०) – विधानसभा निवडणुकीनंतर करमाळा तालुक्याची पहिली वार्षिक आमसभा अखेर ३० मे रोजी होत असून, आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा करमाळ्यातील नालबंद मंगल कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी दिली.
या सभेसाठी नागरिकांनी आपले प्रश्न, निवेदने आणि सूचना karmalaaamsbha@gmail.com या ई-मेलवर १७ मेपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. सभेत २०२४-२५ मधील विकासकामांचा आढावा घेण्यात येणार असून, पुढील वर्षासाठी नव्या योजनांचे नियोजन होणार आहे.
आमसभेचे कामकाज कसे चालते?
तसे पाहता आमसभा ही पंचायत समितीची असते. पंचायत समिती आमसभेचे संपूर्ण आयोजन नियोजन करत असते. आणि गटविकास अधिकारी आमसभेचे सचिव या नात्याने सर्वविभागांशी संपर्क करत असतात. परंतू तालुक्याचे अथवा विधानसभेचे आमदार हे आमसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि आमदार यांनी वेळ दिल्यानंतर किंवा त्यांनी सुचना केल्यानंतरच आमसभा बोलवली जाते.
आमसभेत सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मतदार नागरिक उपस्थित असतात. हे सर्वजण तालुक्यातील अथवा विधानसभा क्षेत्रातील विविध भागांतून येतात.
आमसभेच्या कामकाजात प्रत्येक विभाग आपापल्या मागील वर्षातील कामाचा आढावा सादर करतो आणि येत्या वर्षाचे नियोजन जाहीर करतो. त्यामुळे तालुक्यातील जनतेला प्रत्येक विभागाच्या कामाची माहिती मिळते आणि भविष्यातील कामांची मागणी केली जाते. ही प्रक्रिया विभागनिहाय पार पडते.
तालुक्यातील म्हणजेच विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार आमसभेला उपस्थित राहू शकतात आणि नेहमीच राहतात. विभागांचा आढावा सादर झाल्यानंतर नागरिक आपले प्रश्न उपस्थित करू शकतात आणि मुद्दे मांडू शकतात. आमदार अध्यक्ष म्हणून या कामकाजाचे संचालन करतात.
आमदार हे विविध विभागांचा आढावा घेताना ते आपल्या सूचना देतात आणि नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून देतात.
आमच्या मागणीला यश!
गेल्या अनेक वर्षापासून करमाळा तालुक्यात आमसभा व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्याकडे मागणी करत होतो परंतु या मागणीला आता यश आले असून आमदार नारायण आबा पाटील यांच्या आदेशाखाली ही आमसभा येत्या 30 तारखेला होत आहे. या आमसभेसाठी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले प्रश्न १७ मे पर्यंत पंचायत समितीकडे पाठवावे.