जेऊर – चिखलठाण रस्त्याची गेल्या दहा वर्षापासून दयनीय अवस्था – रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे नागरिकांची मागणी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जेऊर – चिखलठाण रस्त्याची या रस्त्याची गेल्या दहा वर्षापासून दयनीय अवस्था झाली असून, तात्पुरते डागडूजी न करता या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे, अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.

जेऊर – चिखलठाण रस्ता जादा रहदारीचा असून शेटफळ, केडगाव, चिखलठाण नं. १, २, कुगाव या गावाला जाणारा तसेच उजनी जलाशयातून जलमार्गाने इंदापूर, पुणे या शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. परंतू या रस्त्याची गेल्या दहा वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे. सध्या चिखलठाण येथील प्रसिध्द देवस्थान कोटलिंग देवाची यात्रा १३ एप्रिलला आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम शासनाने चालू केले आहे. यात्रेपुरते तात्पुरते हे काम ठिक असलेतरी येणाऱ्या काळात मात्र पावसाळ्यात परत आहे तशीच अवस्था या रस्त्याची होणार आहे.

त्यामुळे आताच्या रस्त्याचे पंतप्रधान योजनेतून चांगल्या स्वरूपाचा डांबरीकरणाचा रस्ता होणे गरजेचे आहे. या भागात केळी व अन्य फळांचा शेतीमाल घेण्यासाठी व्यापारी याच रस्त्याने येतात. परंतू रस्ता खराब असल्यामुळे आता हे व्यापारी शेतीमाल घेण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच रात्री-अपरात्री आजारी पेशंटला तातडीच्या उपचारासाठी या रस्त्याने घेऊन जाणे मुश्कील झाले आहे. या भागात मोठमोठे राजकीय पुढारी आहेत. परंतू गेल्या दहा वर्षात चांगला रस्ता झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. शासनाने या भागातील रस्ता नवीन होण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!