तहसिलदार समीर माने यांची बदली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तहसिल कार्यालयाचे तहसीलदार समीर माने यांची बदली होवून कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तहसील कार्यालय येथे नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांच्या आदेशाने ही बदली झाली आहे. कोरोना कालावधीत तहसीलदार समीर माने यांनी उल्लेखनीय काम केले आहे, याबाबत त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.
तहसीलदार श्री.माने यांच्या काम करण्याच्या गतीमुळे अनेक अडचणींचे रस्ता केसची प्रकरणे निकाली लावून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. प्रत्यक्ष स्थळ पहाणी व त्वरित निकाल दिल्याने अनेक शेतकरी त्यांच्या कामावर समाधान व्यक्त करत आहेत. ३० मार्चपर्यंच्या आकडेवारीनुसार करमाळा तालुक्यात मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम १९०६ चे ५ नुसार २०२० मध्ये १५७ प्रकरणे होती, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ प्रमाणे २६ अशी १८३ प्रकरणे प्रलंबित होती. २०२१ मध्ये १०८ प्रकरणे दाखल झाली. त्यांतर २०२२ मध्ये १२६ व २०२३ मध्ये १९ अशी एकूण ४३६ प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील ३२९ प्रकरणावर निकाल देण्यात आला असून १०७ प्रकरणे शिल्ल्क आहेत. सध्या श्री.माने यांची कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तहसील कार्यालय येथे नियुक्ती झाली असून लवकरच ते तेथे रुजू होणार आहेत.