उजनी धरणग्रस्तांसाठी पाणी राखून ठेवून अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवावा – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – उजनी धरणग्रस्तांसाठी असलेले पाणी राखून ठेवा, जून अखेर पर्यंत उजनी बॅक वॉटर तसेच भीमा सिना जोडकालवा परिसरातील शेतीपंपाना अखंडीत वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली. सोलापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या बैठकीत माजी आमदार नारायण पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की उजनी धरणामध्ये सध्या जेमतेम ९ टी एम सी इतके पाणी साठा उपलब्ध आहे. मृत पाणी साठा म्हणून असलेल्या २० टी एम सी पाण्यात गाळाचे प्रमाण जादा असल्याने हे पाणी शेतीसाठी वापरने कठीण आहे. आता उजनी मध्ये पाणी येण्याचा कोणताही उपाय नाही. यामुळे आहे ते पाणी जून अखेर पर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो.
परंतु उजनी धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाच टी एम सी पाणी वापरता यावे म्हणून आगामी काळात जून अखेर पर्यंत या भागातील वीज पुरवठा तोडला जाऊ नये. उजनिचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात येणार असल्याच्या निर्णयावरून या अगोदर अनेकदा जिल्हाधिकारी यांनी उजनी बॅक वॉटर परिसरातील शेती पंपांची वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महावितरणला दिले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. या परिसरात राज्यातील सर्वाधिक केळी लागवड असून वीजपुरवठा खंडित केल्यास करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना होईल. यामुळे आगामी काळात होणाऱ्या संभाव्य निर्णयात आताच बदल केला जावा अशी मागणी आपण लेखी निवेदन देऊन केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
या अगोदर उजनी काठ परिसरातील जानेवारी ते मे या दरम्यान वीज पुरवठा आठ तासावरून एक तासावर आणणे, वीज कनेक्शन तोडणे हे प्रकार घडले आहेत आणि माजी आमदार नारायण पाटील यांनी आंदोलन अथवा शेतकरी शिष्ट मंडळ समवेत घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हे निर्णय बदल्यानास प्रशासनास भाग पाडले आहे. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी अगोदर जागृत राहून संभाव्य वीज तोड होऊ नये अशी मागणी केली आहे.



