सिबिल स्कोर चेक न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचा आदेश बँका पाळत नाहीत

करमाळा (संदेश प्रतिनिधी): शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी सिबिल स्कोर चा नियम व अटी लावू नये असा शासनाने आदेश दिला असला तरी सर्व बँकांनी या आदेशाची पायमल्ली केली असून एकही बँक शेतकऱ्यांना एक कर्ज द्यायला तयार नाही याबाबत सरकारने ठोस पावले उचलावीत अन्यथा जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी दिला.
याविषयी माध्यमांना अधिक माहिती देताना अतुल खूपसे-पाटील म्हणाले की, यंदा जून महिन्यात पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेताची मशागत करून पेरणी आणि लागवडीसाठी शेतकरी धावपळ करत आहे मात्र खिशात दमडा नसल्याने पीक कर्जाशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र सिबिल स्कोर खराब असल्यामुळे बँका शेतकऱ्यांना दारात देखील उभा राहू देत नाहीत. अशा स्थितीत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आधार देण्याचा प्रयत्न केला आणि सिबिल स्कोर चेक न करता पीक कर्ज देण्याचा आदेश बँकांना दिला. मात्र सरकारचा हा आदेश बँकांनी केराच्या टोपलीत टाकला. त्यामुळे सरकारने बँकांविरोधात ठोस पावले उचलावीत. अन्यथा जनशक्ती संघटना करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे राणा वाघमारे, गणेश वायभासे, रामराजे डोलारे, किशोर शिंदे, सोमा कातुरे, जयसिंग पाटील, बिभिषण शिरसट, महेश नरसाळे, रवींद्र नरसाळे, शहाजी नरसाळे, राहुल जाधव, शंकर नरसाळे, अक्षय देवडकर, सुशांत खूपसे, अभिमान गायकवाड उपस्थित होते.


