शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत कधी?- अंगद देवकते यांचा सवाल

करमाळा (दि.१७) : “महाराष्ट्रातील शेतकरी गंभीर संकटात असताना केंद्र सरकारच्या अहवालानुसार शेतमजुरांचे उत्पन्न शेतकऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतीसाठी लागणारी मशागत, खते, बी-बियाणे, औषधं आणि मजुरीच्या दरात झालेली महागाई पाहता शेती तोट्याची ठरली आहे. त्यातच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी एका प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केली.

या निवेदनाची प्रत करमाळा येथील नायब तहसीलदार विजय लोकरे यांना देण्यात आली. यावेळी देवकते यांच्यासोबत रासपचे पदाधिकारी बाळासाहेब टकले, जगन्नाथ सलगर, नामदेव पालवे, शिवाजी खटके, विकास मेरगळ, सुधीर ठोंबरे, सुनील बंडगर, रघुनाथ खटके, यशवंत सलगर, शंकर सुळ, दीपक कडू आदी उपस्थित होते.

सरकारकडून शेतकऱ्यांच्या आशा पायदळी!
देवकते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर हे आश्वासन पूर्ण करण्याऐवजी विसर पडल्यासारखे वागणे सुरू आहे. आता या सरकारला सत्तेचा माज आला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. पंचनामे होऊनही अद्याप शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. हे त्रिसदस्यीय सरकार केवळ घोषणा करत असून शेतकऱ्यांचे देणे-घेणे काहीच राहिलेले नाही. कृषी मंत्री शेतकऱ्यांची थट्टा करत असून सरकारने दिलेले शब्द पाळावेत.”

रासपचा इशारा – अन्यथा तीव्र आंदोलन
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी देवकते यांनी केली. “या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.




