रिटेवाडी योजना वर्षभरात मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - मंगेश चिवटे -

रिटेवाडी योजना वर्षभरात मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन – मंगेश चिवटे

0

करमाळा(दि. २२): करमाळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य बदलणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरच प्रत्यक्षात येणार असून, येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेस मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती मंगेश चिवटे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालयीन अधिकारी आणि करमाळ्याचे भूमिपुत्र मंगेश चिवटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी त्यांनी रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले.

या योजनेसंबंधी सर्वेक्षणाचा अहवाल मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “रिटेवाडी योजना आम्ही निश्चितच मार्गी लावू. मंत्रिमंडळाच्या येणाऱ्या बैठकीत हा विषय घेतला जाईल.”

या योजनेसाठी जलसंपदा विभागामार्फत सर्वेक्षणासाठी ४७ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. योजना दोन टप्प्यांत विभागली असून, कुकडी प्रकल्पातील जवळपास तीन टीएमसी पाणी उजनी धरणात सोडले जाणार आहे. त्यानंतर उजनी धरणातून पंपहाउसच्या माध्यमातून हे पाणी उचलून कुकडी कॅनलमार्फत करमाळा तालुक्यातील लाभार्थी गावांमध्ये पोहोचविण्यात येणार आहे. यामुळे सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून तालुक्यात हरितक्रांती घडणार आहे.

मंगेश चिवटे यांनी सांगितले की, “पूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा सचिव कपूर यांना या योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. त्यानंतर या योजनेची तयारी झाली असून, आता अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. सद्य:स्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या महायुती सरकारमध्ये ही योजना प्रत्यक्षात येईल, असा विश्वास वाटतो.”

वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी एक लाखांची देणगी

मंगेश चिवटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची देणगी दिली. गेल्या आठ वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवत त्यांनी यावर्षीही गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला.

“३० व्या वाढदिवसाला ३० हजारांची देणगी देऊन ही परंपरा सुरू केली होती. मुलगी मुक्ताई आणि वडील नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त देखील अशा प्रकारे निधी दिला आहे. समाजसेवा आणि रुग्णसेवा यासाठी माझ्या परीने मी योगदान देत राहीन,” असे चिवटे यांनी सांगितले.

तसेच दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. SSPEसारख्या गंभीर आजारांमुळे त्रस्त लहान मुलांच्या कुटुंबीयांना शासनाने सहानुभूतीपूर्वक मदतीचा हात द्यावा, अशीही नम्र मागणी त्यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!