"थकीत पगाराशिवाय काम नाही!"– मकाई साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार -

“थकीत पगाराशिवाय काम नाही!”– मकाई साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार

0

करमाळा, २३ जून : श्री मकाई सहकारी साखर कारखाना, भिलारवाडी (ता. करमाळा) येथे थकीत वेतनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांनी अखेर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. कारखान्याच्या प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांना १९ जून रोजी कामावर बोलावले होते. मात्र, थकीत पगाराची रक्कम खात्यावर जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांनी एकत्र सभा घेऊन कामावर न जाण्याचा निर्णय घेतला.

प्रशासनाच्यावतीने हरिश्चंद्र खाटमोडे यांनी परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, “संपूर्ण थकीत वेतन खात्यावर जमा झाल्यानंतरच आम्ही कामावर रुजू होऊ.”

सदर कारखान्यास एनसीडीसीकडून सुमारे १४० कोटी रुपयांचे कर्ज तीन महिन्यांपूर्वीच प्राप्त झाले आहे, व कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, २०१६ पासून २०२३ पर्यंत कर्मचाऱ्यांचे सुमारे ४० ते ४५ महिन्यांचे वेतन थकीत आहे. याचबरोबर २०१६ पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) भरलेला नाही. काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पीएफ थकित असल्याने त्यांची पेन्शनही सुरू झालेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसीही बंद झाल्या आहेत.

कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या संकटाच्या काळात स्वतःच्या नावे कर्ज घेऊन संस्थेला साथ दिली. त्यामुळे त्यांचे सिबिल स्कोअर खराब झाले असून आर्थिक बोजा वाढलेला आहे. तरीही त्यांनी कधीही प्रशासनावर दोष न देता कारखान्याच्या हितासाठी सेवा दिली. दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक उस क्रशिंग करून उत्पादन वाढवले.

आता कारखान्याकडे निधी उपलब्ध असूनही कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!