शेतातील किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण - दोघांविरूध्द गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

शेतातील किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण – दोघांविरूध्द गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तु आमचे रानातील दगड का गोळा करत आहे ? हे रान आमचे आहे, तुझा काही एक संबंध नाही रानातुन बाहेर निघ असे म्हणून दोघांनी मिळून एकास बेदम मारहाण करून जखमी केले आहे, हा प्रकार कंदर (ता.करमाळा) येथील शिवारात ३ ऑक्टोबरला घडला असून याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी वसंत काशिनाथ माने (वय 74) मुळ (रा.कंदर ता.करमाळा सध्या रा.टेंभुर्णी ता.माढा जि.सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले की, आमचे व निखिल अंबरनाथ माने यांची सामाईक शेती बांध आहे. याच शेतजमिनीचे वहिवाटीचे कारणावरुन अक्षय माने व निखिल माने हे नेहमी मला त्रास करित असतात शिवीगाळी, दमदाटी करित असतात.

३ ऑक्टोबर रोजी दुपारी 12/30 वा.चे सुमारास मी व माझे शेत मजुर नामे कांतीलाल साहेबराव काळोखे व बिभिषण सुर्यभान् शिंदे असे मिळुन शेतामध्ये दगड गोळा करण्याचे काम करित होतो. त्यावेळी त्या ठिकाणी अक्षय अंबरनाथ माने व निखिल अंबरनाथ माने दोघे रा.कंदर ता. करमाळा हे मला शिवीगाळी दमदाटी करित मला तू आमचे रानातील दगड का गोळा करत आहे. हे रान आमचे आहे, तुझा काही एक संबंध नाही रानातुन बाहेर निघ असे म्हणत मला जोरजोरात शिवीगाळी करु लागले.

त्यावेळी अक्षय माने यांचे हातामध्ये काठी होती मी त्या दोघांना मला शिवागीळी करु नका असे म्हणालो, असता अक्षय माने याने त्याच्या हातातील काठीने माझे तोंडावर मारले त्यावेळी माझे तोंडातील एक दात पडुन त्यातुन रक्त येऊन मला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!