देवीचामाळ रस्त्यावरील अतिक्रमणाच्या वादात आणखीन भर – तुळशी वृंदावनाच्या बांधकाम व नावावर आक्षेप

करमाळा (दि.३०) : करमाळा येथील देवीचामाळ रस्त्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रस्त्यालगत फळ व भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित विभागांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील सावंत यांनी भाजी विक्रेत्यांची बाजू घेत, त्यांना विक्रीसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली. यामुळे चिवटे आणि सावंत यांच्यात मतभेद उफाळून आला आहे.

याच पार्श्वभूमीवर, चिवटे कुटुंबीयांनी देवीचामाळ रोडवर उभारलेल्या भव्य तुळशी वृंदावनाच्या प्रतिकृतीच्या बांधकामावर व नावावर सुनिल सावंत आणि त्यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली बबन चांदगुडे, भाजपचे सरचिटणीस शशिकांत पवार, सचिन गायकवाड आणि माजी नगरसेवक महादेव फंड यांनी नगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी सचिन तपसे यांना घेराव घालत विरोध नोंदवला.

त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, वृंदावन उभारण्यासाठी पालिकेचा ठराव झाला का? यासाठी खर्च कुठल्या निधीतून केला गेला? तसेच, यास नरसिंह चिवटे यांचे नाव का देण्यात आले? तसा ठराव घेण्यात आला होता का? सावंत यांनी वृंदावनाच्या जागेवर आक्षेप घेत सांगितले की, रस्त्यावर हे तुळशी वृंदावन उभारल्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. त्यांनी हे बांधकाम पालिकेच्या मोकळ्या जागेत व्हावे, अशी मागणी केली.
करमाळा भाजपचे सरचिटणीस शशिकांत पवार म्हणाले की, हे तुळशी वृंदावन बांधताना वास्तुशास्त्रा नुसार दिशा पाहिली नसून दक्षिणाभिमुख बांधले आहे. हे अशुभ मानले जात असून, त्यामुळे करमाळ्यावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

यावर मुख्याधिकारी तपासे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, वृंदावन उभारण्याचा ठराव पालिकेने मंजूर केला आहे. बांधकामाच्या फाउंडेशनचा खर्च पालिकेने केला असून, सुमारे १५ लाख रुपयांची डेकोरेशन, सजावट व लाईटिंग नरसिंह चिवटे यांनी त्यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त केली आहे. मात्र, जागा नगरपालिकेची असल्याने चिवटे यांचे नाव फलकावरून काढावे अशी मागणी सावंत व इतरांनी केली. तेव्हा नाव काढले जाईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले, ‘‘हिंदू संस्कृतीत पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशी वृंदावनाला विरोध करणारी मानसिकता करमाळ्यात निर्माण होणे हे दुर्दैवी आहे. आम्ही प्रसिद्धीसाठी नव्हे, तर वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हे वृंदावन उभारले आहे. नाव काढल्यास आम्हाला हरकत नाही. विरोध वाढल्यास हे वृंदावन हलवण्यासही आम्ही तयार आहोत.’’
चिवटे यांनी पुढे आरोप केला की, ‘‘देवीचामाळ रोडवरील अतिक्रमित टपऱ्यांतून जुगार, गांजा विक्री, नशेचे इंजेक्शन्स, क्रिकेटवर सट्टा आणि बेकायदेशीर दारू विक्री यांसारखे अवैध धंदे सुरू आहेत. तथाकथित समाजसुधारक यावर मौन बाळगतात, पण पवित्र वृंदावनाला आक्षेप घेतात. अशा प्रवृत्तींचा जनतेने विचार करावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले.


