करमाळ्यात जैन बांधवांचा झारखंड सरकारच्या निर्णयावर निषेध मोर्चा - करमाळा तालुक्यातील अनेक संघटनांचा पाठिंबा.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात जैन बांधवांचा झारखंड सरकारच्या निर्णयावर निषेध मोर्चा – करमाळा तालुक्यातील अनेक संघटनांचा पाठिंबा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.२१) : जैन धर्मीयांचे अतिशय पवित्र असनाऱ्या सिद्धक्षेत्र श्री महापर्वतराज श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटन क्षेत्र घोषित केल्याचा झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध करणेबाबत करमाळा शहरासह तालुक्यातील सकल जैन बांधवांच्यावतीने करमाळा शहरातून निषेध मोर्चा काढून तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.

दिलेला निवेदनात त्यांनी म्हटले की, जैन धर्मियांचे २४ तीर्थंकरापैकी २० तीर्थंकर ज्या पवित्र भूमीत मोक्षाला गेले अश्या झारखंड राज्यातील मधूबन (जिल्हा – गिरडीह) येथील महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने “पर्यटन क्षेत्र” म्हणून घोषित केले आहे.या अनुषंगाने त्या ठिकाणी नॉनव्हेज हॉटेल्स, पब बार व इतर अशा बऱ्याच मनोरंजक गोष्टी सुरू होतील की ज्या अहिंसा तत्वाच्या एकदम विरुद्ध असणार आहेत.

जागतिक पातळीवर जैन समाज हा शांतताप्रिय व अहिंसा तत्वाचा पुजारी आहे. जैन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन २० तीर्थंकर पवित्र मोक्ष भूमीवर पहाड वंदना अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो.परंतु सरकारच्या सदर निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भूमीचे पावित्र्य धोक्यात आले असून जैन समाजाच्या अस्मितेवर घाला घालायचा हा प्रयत्न आहे.या निर्णयामुळे देशभरातील सकल जैन समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून देशभरात सर्व थरातून या निर्णयाचा निषेध केला जात आहे.

भारताचे मा.राष्ट्रपती,मा.पंतप्रधान व झारखंड राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी सदर निर्णय बदलून जैन समाजाच्या भावनांचा आदर करावा ह्यासाठी हे निवेदन करण्यात आले आहे. या निवेदनावर करमाळा तालुक्यातील जैन बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जैन समाजाच्या या मोर्चास शहरातील सर्व पक्ष, सर्व संघटना यांचे समर्थन लाभले.
तसेच सर्व व्यापारी संघटनांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवून जैन समाजाला आपला पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!