मराठा व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतीगृह भत्ता मिळणार – प्रा.रामदास झोळ

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या मुलांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे समान शैक्षणिक सवलती देण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून एसटी, एससी, व धनगर या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक सवलती मिळतात त्या सवलती ओबीसी व मराठा समाजाला मिळाव्यात त्यामध्ये वस्तीगृह भत्ता मिळावा या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणी मध्ये लक्ष घालून मंत्रिमंडळात मंजुरी घेतली असल्याची माहिती रामदास झोळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
याबाबत अधिक माहिती देताना रामदास झोळ म्हणाले की, मराठा व ओबीसी समाजाला आरक्षणाबरोबरच शैक्षणिक सोयी सवलती दिल्या तर खऱ्या अर्थाने त्या गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. आरक्षणाबरोबरच शैक्षणिक सोयी सवलती मध्ये विद्यार्थ्यांना वस्तीगृह भत्ता मिळणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने आपण एसटी एससी व धनगर या प्रवर्गाप्रमाणेच मराठा व ओबीसी विद्यार्थ्यांनाही वस्तीगृह भत्ता मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यामार्फत वांरवार पाठपुरावा करत होतो.
या मागणीला आता खऱ्या अर्थाने यश मिळाले असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळाने मान्यता देऊन यासंबंधीचा शासन निर्णय काढला असल्याने मराठा तसेच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्ण वस्तीगृह भत्ता मिळणार आहे . सदरचा लाभ यावर्षी शिकत असलेल्या व वस्तीगृहात राहत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी मी महाराष्ट्र शासनाला मराठा व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये संपूर्ण फी माफी देण्याबाबत मागणी केली होती, याबाबत महाराष्ट्र शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शासना च्या मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या चंद्रकांत पाटील समितीने ईडब्ल्यूएस व ओबीसी प्रवर्गामधील मुलींसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये संपूर्ण फी माफी करण्याबाबत व त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करण्याबाबत शासनास शिफारस केलेली आहे.
शैक्षणिक सोयी सवलती समानतेच्या धोरणावर मराठा व ओबीसी घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी केलेल्या मागणीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्वल होण्याचा मार्ग मोकळा झाला असून मराठा समाजाला या समाजातील विद्यार्थ्यांना या खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.


