८ तास वीजपुरवठा होणेबाबत लवकरच तोडगा काढू : उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उजनी धरणावरती सोलापूर ,पुणे आणि अ.नगर या ३जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे भवितव्य धरणातील पाण्यावरती अवलंबून असून, टंचाईची परिस्थिती लक्षात घेता उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील शेती पंप तसेच पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा हा कमी करण्यात आला होता. हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे ,माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, आमदार जयकुमार कोरे , सोलापूर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या समवेत आपण ४ एप्रिल रोजी सायंकाळी भेट घेतली असून, उजनीच्या परिसरातील विजेची समस्या त्यांच्यासमोर मांडली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, उजनी धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी बारमाही पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली असून, त्यासाठी किमान ८ तास वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. सदर वीज पुरवठा कमी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असून शेतकरी संकटात सापडणार आहे.
ही बाब लक्षात घेऊन शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे ही समस्या मांडली असून, लवकरच सोलापूर, नगर आणि पुणे या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेऊन यावरती तोडगा काढू असे आश्वासन ना.फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. शेतीसाठी ८ तास वीज पुरवठा व्हावा, भीमा नदी बंधाऱ्यावरील पाणीपुरवठा योजनांना होणारा वीज पुरवठा, ग्रामीण तसेच शहरी भागातील टँकर द्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा याविषयी या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.


