जिल्हा नियोजन बैठकीत दिग्विजय बागल यांनी केल्या विविध मागण्या

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – काल दि. ३ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या समितीवर मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांची प्रथमच निवड झाली आहे. आपल्या पहील्याच बैठकीत दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील विविध प्रश्न मांडले. यात पिक विमा, कुकडी ओव्हरफ्लो पाणी,केळी नुकसान भरपाई,वर्ग ३ जमिनी वर्ग १ करणे,वनजमिनीवरील वसाहत आदी विविध प्रश्न त्यांनी या बैठकीत उपस्थित केले.
कुकडी लाभक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला असल्यामुळे कुकडी प्रकल्पातील ओहरफ्लो पाणी, मांगी, रोशेवाडी, वीट,राजुरी, कुंभेज तलावात तसेच तालुक्यातील इतर सर्व तलाव भरून घ्यावेत अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे नवनियुक्त सदस्य दिग्विजय बागल यांनी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित केला.

याचबरोबर करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे मे महीन्यात ४२२४ हेक्टर वरील केळी बागांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे ही कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत.परंतू अद्याप पर्यंत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे तसेच खरीप हंगामातील सन २०२३/२४ मधील खरीप पीक विमा रक्कम रु १७ कोटी ६१ लाख रुपये वाटप करणे, सरपडोह येथील देवस्थान जमिनीवरील वर्ग 3 शेरा कमी करुन वर्ग 1 करणे, कामोने, विठ्ठलवाडी, कुंभेज, देवळाली येथील वन जमिनीवर मागील ७० ते ८० वर्षापासून अधिवास करत असलेल्या वसाहती नियमित करणे असे विविध मुद्दे उपस्थित करुन जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांच्याकडे यासंदर्भात विषेश लक्ष घालून संबधित विभागास योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक दखल घेत संबधित विभागास माहिती घेऊन याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे बागल यांनी सांगितले

