काळा आला आणि एका मिनीटात होत्याचं नव्हतं झालं..!

करमाळा (दि.७) : काळाची हे उडी पडेल बा जेंव्हा । सोडविना तेंव्हा माय-बाप ॥ या तुकोबारायाच्या अभंगाच्या ओळी देवळाली येथे अनुभवयास आल्या. शेतात टोमॅटो काढण्यासाठी सासू आणि सुन मिळून गेल्या आणि एका मिनीटात होत्याचं नव्हतं झालं. वीजेचा शॉक बसला आणि सासू जागीच ठार झाली.
हा प्रकार देवळाली येथे सकाळी साडेअकरा वाजता गुंड यांच्या शेतात झाला आहे. देवळाली येथील मृदुला संजय गुंड (वय ४५) या आपली सुन स्नेहल राजकुमार गुंड यांच्याबरोबर शेतातील टोमॅटोच्या प्लॉटमध्ये टोमॅटो तोडण्यासाठी गेल्या होत्या. टोमॅटोच्या कंपाऊंड वर वीज वाहक तार तुटून कधी पडली हे या दोघींना माहित नव्हते. संपूर्ण कंपाऊंडला वीजेचा करंट होता. मृदुला गुंड या कंपाऊंडच्या कडेने टोमॅटो तोडत असताना कंपाऊंडला धक्का लागला आणि जागीच त्या कोसळल्या. सुनेला काही समजण्याच्या आत त्या गतप्राण झाल्या. सुदैवाने सुन स्नेहल गुंड यांना हा वीजेचा धक्का असल्याचे समजल्याने त्या मोठ्याने ओरडल्या व बाजुला झाल्या म्हणून त्या वाचल्या.
वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे आज (ता. ७) या गुंड परिवारातील महिलेला जीवानिशी जावे लागले आहे.


मृदुला गुंड यांच्या मागे पती, एक मुलगा, मुलगी, सुन असा परिवार आहे. सायंकाळी चार वाजता त्यांचेवर शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी देवळाली व परिसरातील मान्यवर उपस्थित होते. या दुर्घटनेने देवळालीकरांवर शोककळा पसरली आहे.





