“विकसित गाव” संकल्पनेतून सेंद्रिय शेती, जलसंधारण व हरित वारीस प्रोत्साहन

करमाळा (दि.५) –सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्या “विकसित गाव” या संकल्पनेअंतर्गत काल (दि.५ जून) फिसरे (ता. करमाळा) येथे सेंद्रिय शेती, जलतारा प्रकल्पाचे महत्त्व, तसेच हरित वारी अभियान यावर मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांनी जलतारा प्रकल्पातून शेतीसाठी बारमाही पाणी मिळवावे, सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त भाजीपाला व फळे उत्पादन करावी, आणि त्यामुळे गावाची आर्थिक उन्नती साधून गुन्हेगारीमुक्त गाव घडवावे, असा हेतू आहे.

कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी भरत आवताडे यांच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट देत प्रत्यक्ष शेतपिकांचे निरीक्षण केले. या प्रसंगी करमाळा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, शेतीतज्ज्ञ, तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सेंद्रिय अन्नधान्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. खेड्यांचा विकास झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि महाराष्ट्र समृद्ध झाला तर देशही समृद्ध बनेल.”

त्यांनी पुढे सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील पहिले १०० गावे विकसित करून संपूर्ण महाराष्ट्रात रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारण्याचे उद्दिष्ट आहे. “सेंद्रिय शेती करा, स्वतःचे आरोग्य, उत्पन्न आणि जमिनीची प्रत वाढवा,” असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात यशकल्याणी संस्थेचे गणेश करे पाटील यांनी सेंद्रिय शेतीच्या फायदे विषद करत सांगितले, “आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे-पाटील (पोलीस पाटील, पोथरे) यांनी केले, तर आभार प्रदर्शन भरत आवताडे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात करमाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पालखी मार्गावर वृक्षारोपण उपक्रम व जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.


