करमाळा शहरातील समस्यांवर घंटानाद आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांकडून तत्काळ कारवाईचे आश्वासन

करमाळा(दि. १८): शहरातील वाढत्या नागरी समस्या आणि नागरी सुविधांच्या कमतरतेविरोधात आज शहर विकास आघाडीच्या वतीने करमाळा नगरपरिषदेच्या समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनादरम्यान मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी आजपासून कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी शहर विकास आघाडीचे नेते सुनील सावंत यांनी मुख्याधिकारी तपसे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील विविध तातडीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले होते.

सावंत म्हणाले की, “शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाच-पाच दिवस पाणी मिळत नाही. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांची कुचंबणा होऊ नये म्हणून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.”

तसेच शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असून, अनेक ठिकाणी कचरा साचलेला आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच आषाढी एकादशीपूर्वी जंतूनाशक पावडर व फिनेलची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली.

या आंदोलनात माजी नगरसेवक फारुक जमादार, रवींद्र कांबळे, दिपक सुपेकर, भारिपचे नेते देवा लोंढे, हुमरान मुलाणी, गणेश अडसूळ, पांडुरंग सावंत, साजिद बेग, विलास क्षिरसागर, साबीर नजीर शेख, बापू मोरे, जमीर सय्यद, राजेंद्र कसाब, बापू उबाळे, भाऊ दुधाळ, जमील काजी, संभाजी गायकवाड, मार्तंड सुरवसे, दत्ता कांबळे आदींची उपस्थिती होती.

आंदोलन स्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस कर्मचारी विभीषण जाधव, गणेश दळवी, भाऊसाहेब शेळके, गणेश शिंदे यांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली.



