आधुनिक शेतीतील आदर्श कार्याबद्दल धुळाभाऊ कोकरे यांना पुण्यात ‘अहिल्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा, ता.५: कुगाव येथील प्रगतिशील शेतकरी धुळाभाऊ केरू कोकरे यांना शेती क्षेत्रात अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोष उत्पादन घेऊन अन्य शेतकऱ्यासमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय धनगर अधिवेशनात अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात “आधुनिक शेती” या प्रकारात हा सन्मानाचा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार खासदार विकास महात्म्ये व प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विश्वासराव देवकाते (मा.अध्यक्ष जि.प. पुणे), आमदार रामराव वडकुते, नितीन वाघमोडे (आयुक्त, आयकर विभाग), नयना गुंडे (आयुक्त, महिला व बालकल्याण विभाग), मा. आमदार विजयराव मोरे, प्रा. यशपाल भिंगे, शशिकांत तरंगे (प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस), कैलास बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.कोकरे यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ग्रामीण भागात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या शेतात स्मार्ट सिंचन प्रणाली बसविण्यात आली असून जमिनीतील आर्द्रता, हवामान व पोषणद्रव्यांचे सेन्सरद्वारे परीक्षण केले जाते. AI आधारित डेटा विश्लेषणाद्वारे पिकांचे आरोग्य, उत्पादन व बाजारभावाचे नियोजन केले जाते. यामुळे खर्चात बचत, पाण्याचा योग्य वापर आणि उत्पादनक्षमता वाढली आहे.

कोकरे यांनी निर्यात दर्जाचे केळी उत्पादन करताना टिश्यू कल्चर रोपे, ड्रिप सिंचन, फर्टिगेशन तंत्रज्ञान आणि AI मॉनिटरिंगचा प्रभावी वापर केला आहे. त्यांच्या शेतातील उत्पादन महानगरांसह आखाती देशांमध्ये पाठविण्यास योग्य ठरले आहे. शेतीपासून पॅकिंग आणि बाजारव्यवस्थेपर्यंत त्यांनी गुणवत्ता आणि शिस्त यांना प्राधान्य दिले आहे.

उजनी बॅकवॉटर काठच्या भौगोलिक आव्हानात्मक परिस्थितीत कोकरे यांनी शेतीबरोबरच पर्यटन आणि कृषी शिक्षणाचा संगम साधला आहे. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि नवीन पिढीतील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जाते. “शेती म्हणजे विज्ञान, संस्कार आणि स्वाभिमान” या विचारांनी त्यांनी ग्रामीण भारतात नवचैतन्य निर्माण केले आहे. धुळाभाऊ कोकरे यांच्या कार्याचा गौरव करताना समाजाने त्यांच्या दूरदर्शी मनोवृत्तीचा सन्मान केला आहे. “आपण बदललो तर शेती बदलते, आणि शेती बदलली तर देश बदलतो” या विचारधारेवर चालणारे कोकरे ग्रामीण भागातील आधुनिक शेतीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे ग्रामसुधार समितीसह अनेकांनी विशेष अभिनंदन केले आहे


