आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 23 फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चा

करमाळा : आदिवासी समाजातील विविध प्रश्न, हक्क तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आदिवासी मंत्रालयाच्या विविध धोरणांच्या विरोधात राज्यभरातील आदिवासी समाज एकवटत असून, सोमवार, 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोळी महासंघाचे ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ सुरवसे यांनी याविषयी माहिती माध्यमांना दिली. ते म्हणाले की, हा महामोर्चा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांवर प्रेरित असून, राज्यातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, डोंगरे कोळी व मल्हार कोळी समाजातील विविध संघटना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा आदिवासी टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, डोंगरे कोळी, मल्हार कोळी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व समाजातील ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ सुरवसे आणि बाळासाहेब बळवंत करीत आहेत. या महामोर्चासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता असून, सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. महामोर्चासंदर्भातील अधिक माहितीसाठी गणेश बाबासाहेब माने (कोळी महासंघ, करमाळा) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून, संपर्क क्रमांक 9881323824 देण्यात आला आहे.


