दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सकस दुधच संस्थेकडे द्यावे - गणेश चिवटे - Saptahik Sandesh

दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सकस दुधच संस्थेकडे द्यावे – गणेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.१७) : ग्रामीण भागात दुध संस्थाकडे दुध घालणाऱ्या दुध उत्पादकांनी सकस दुधच संस्थेला द्यावे; असे आवाहन नेचर डिलाईट चे तालुका संकलन केंद्राचे प्रमुख व तालुका भाजपा अध्यक्ष गणेश चिवटे यांनी व्यक्त केले. घोटी (ता.करमाळा) येथील संत सावता माळी सहकारी संस्थेच्या २६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून चिवटे बोलत होते.

यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ग्रामसुधार संस्थेचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबूराव हिरडे, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मनोज राऊत, नेचरचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन रूपनवर, मुरघास तज्ञ श्रीमंत झाकणे तसेच डॉ.रेवणनाथ पाटील, डॉ. सतीश देवरे, सेल्स मॅनेजर युवराज सातव आदीजण उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. चिवटे म्हणाले, की दुध हे अमृत आहे. प्रत्येक घरात लहानापासून वृध्दापर्यंत दुध आहारात घेतले जाते. त्यामुळे खाणाऱ्यांना सकस व कसदार दुध गेले पाहिजे व ते दुध आपण घालतो. आपण चांगले दुध दिले तर खाणारा संतुष्ट होतो व त्याचा दुवा आपणाला मिळतो. यावेळी पशु संवर्धन कसे करावे यावर डॉ. सचिन रूपनवर यांचे तर दुध संकलन कसे वाढवावे यावर सेल्स मॅनेजर युवराज सातव यांचे भाषण झाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन मोहन मारूती शेंडे यांनी केले. यावेळी त्यांनी दिवाळीमध्ये वार्षिक दुधापोटी १ लिटर दुधामागे २० पैसे बोनस देण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे, सचिव लक्ष्मण ननवरे, दत्तात्रय थोरात गणेश बदर, गणेश ननवरे, रामचंद्र राऊत, दत्ता शेंडे, अनिल ननवरे यांनी केले. सुत्रसंचलन सचिन खरात यांनी केले.

यावेळी मारूती शेंडे, उध्दव शेंडे गुरुजी हे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते त्यांचे विशेष सत्कार केले. उपस्थितांचे स्वागत नवनाथ ननवरे, योगेश म्हेत्रे, रमेश दुधे, सचिन कानडे, गणेश बदर, मनोज चिंदे, बळीराम दुधे, रामभाऊ राऊत, सुभाष दुधे, दत्ता शिंदे, बाळासाहेब ननवरे, बापूराव शिंदे यांनी केले. यावेळी माजी मुख्याध्यापक अरूण ननवरे, मुख्याध्यापक श्री. ढगे, श्री. मोरे, श्री. जाधव यांने सन्मान करण्यात आले.

उत्पादनाबरोबरच काटकसर व बचत केलीतरच आपली प्रगती होऊ शकते. केवळ उत्पादन वाढले पाहिजेच पण मिळवलेला पैसा हा खर्च करताना काटकसरीने खर्च केला पाहिजे. प्रतिष्ठेच्या मागे न धावता बचत केली पाहिजे तरच आपली प्रगती होवू शकते. प्रतिष्ठेपायी एका एका गावात गरजेपेक्षा जास्त म्हणजे शंभर पेक्षा जास्त ट्रॅक्टर खरेदी केले जातात. या शंभर ट्रॅक्टरचे अर्थशास्त्र समजून घेतलेतर एका ट्रॅक्टरला १२ लाख लागतात. म्हणजे अनावश्यक ट्रॅक्टरसाठी १२० कोटी रूपये गुतंवणूक होते. ज्या रकमेत छोटा साखर कारखाना उभा राहू शकतो. अशाच बाबी व्यसनाच्या आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ, खर्च काटकसरीचा व व्यसने टाळून बचत करणे गरजेचे आहे.

– ॲड.डॉ.बाबूराव हिरडे (अध्यक्ष, ग्रामसुधार समिती)

यावेळी संत सावता माळी दुध संस्थेच्यावतीने सभासंदाचा सहपरिवार संपूर्ण पोशाख भेट दिला. तसेच सर्वांना भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. नेचर डिलाईट संस्थेच्यावतीने चेअरमन मोहनराव ननवरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!