अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी पात्र महिलांनी अर्ज करावेत – लक्ष्मी सरवदे
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2024/05/images-29.jpeg)
करमाळा (संदेश प्रतिनिधी)- २०२३ पासून महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीतील २ कर्तबगार महिलांना दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला जात आहे. त्यामुळे पात्र महिलांनी पुरस्काराच्या प्रस्तावाकरिता आप आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन पुरस्कारा करिता लागणारे सर्व कागदपत्रे नियम व अटी माहिती करून घेऊन आपल्या स्वतःच्या कार्याची माहिती व पूर्ण नावासह ग्रामपंचायत कार्यालयात जमा करून सहभाग घेण्याचे आवाहन घारगावच्या माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी केले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन महिलांना सन्मानपत्र,सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ ,पुष्प तसेच प्रत्येकी ५००/- रुपये देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे. पात्रता निकष पुढील प्रमाणे आहे –
१. महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट/उल्लेखनिय कार्य करीत असलेल्या महिला,
२. सदर महिला हया त्याच ग्रामपंचायतीतील/गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी,
३. त्याचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती / गट ग्रामपंचायतीमध्ये केलेले असावे,
४. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान ३ वर्ष कार्य केलेले असावे,
५. पुरस्कार प्राप्त महिला या सात वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी पुन्हा पात्र ठरतील,
६. महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी,
७. सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा,
८. महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी,
९. बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा.
पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपध्दती:-
इच्छुक महिलेने स्वत:ची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.
३१ मे ला गावा गावात अहिल्यादेवींची जयंती साजरी करावी
अहिल्या देवींना एका समाजा पुरते मर्यादित न ठेवता सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन प्रत्येक गावागावात ३१ मे ला अहिल्या देवी जयंती साजरी करावी.
– सौ लक्ष्मी संजय सरवदे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या,घारगाव
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2024/05/img-20240528-wa00111180330952704795371-1024x911.jpg)
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240520-WA0020-1024x1024.jpg)
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240518-WA0005.jpg)
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240519-WA0009.jpg)