शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रात येण्याची गरज – ॲड डॉ बाबुराव हिरडे
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221216-WA0009-300x200.jpg)
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेतकऱ्यांच्या मुलांना शेती पूरक व्यवसाय व उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध आहेत, परंतु धाडस व कष्ट करण्याची तयारी याचा अभाव दिसत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रात येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबुराव हिरडे यांनी शेटफळ (ता.करमाळा) येथे येथील वैभव पोळ यांच्या नागराज ठिबक या ठिबक उत्पादक कंपनीच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221216-WA0010-1024x524.jpg)
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटक भालचंद्र पाठक होते, पुढे बोलताना ॲड.हिरडे म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मुलांनी विविध क्षेत्रातील माहिती घेऊन वेगवेगळ्या उद्योग व व्यवसायात धाडसाने उतरण्याची गरज आहे या संदर्भात शेटफळ येथील तरूणांचा आदर्श इतर गावातील तरुणांनी घ्यावा यावेळी ह भ प विठ्ठल पाटील महाराजांनी वैभव पोळ यांनी अल्पावधीत कष्ट व चिकाटीच्या जोरावर यश मिळवले आहे उद्योग व्यवसाय याबरोबरच ते सामाजिक बांधिलकीच्या भावनेतूनही वेगवेगळे कार्य करत असतात याचा फायदा गावातील लोकांना होत असून भविष्यात त्यांची अशीच प्रगती व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले कि, शेतकऱ्यांपुढील विविध समस्येसाठी शेतकऱ्यांनीच उत्तरे शोध दिली पाहिजेत आणि संघटित होऊन एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवण्याची गरज आहे, लोकविकास डेअरीचे दीपक आबा देशमुख यांनी शेतकऱ्यांची जी मुले नवीन व्यवसाय उद्योग करू इच्छित आहेत त्यांना वडीलांनी व सर्व घरातील मंडळींनी प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी शेटफळ येथील तरुणांनी गट शेतीच्या माध्यमातून एकत्र येऊन विविध व्यवसाय उद्योग व्यवसाय उभारत आहेत याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना होत असून तालुक्यातील इतर गावातील तरुणांनी याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले अध्यक्ष स्थानावरून बोलताना भालचंद्र पाठक यांनी शेती पिकवताना शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून विषमुक्त शेती पिकवण्याचा ध्यास घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला सरपंच विकास गुंड, ग्राहकपंचायतीचे भालचंद्र पाठक, विठ्ठल पाटील महाराज, सनदी लेखपाल विकास वाघे , केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल पाटील लोकविकास डेअरीचे दीपक देशमुख महेंद्र पाटील पत्रकार अशोक मुरूमकर मकाईचे माजी संचालक किरण पोळ, आदिनाथचे माजी संचालक सुरेश पोळ, कैलास लबडे विलास लबडे नानासाहेब साळुंखे प्रशांत नाईकनवरे विष्णू पोळ राजेंद्र साबळे विजय लबडे यांच्यासह या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार वैभव पोळ यांनी मानले.
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/Screenshot_20221205-213712_WhatsApp-688x1024.jpg)
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/01-1-880x1024.jpg)