उजनीतील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करा – प्रा.शिवाजीराव बंडगर

करमाळा (दि.२२)- सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी जलाशयातून नदीवाटे पाणी सोडण्याच्या पद्धती मुळे 25 ते 30 टी एम सी अनाठायी वाया जाते. त्यामुळे सोलापूर शहराला पाणी पुरववठा करण्याकरिता तयार होत असलेल्या समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करून ती कार्यान्वित करावी अशी मागणी करमाळा तालुका उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. बंडगर म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उजनी धरण 50 टक्के जास्त म्हणजे 111%भरले होते. यावेळी 123 टी एम सी पाणी जलाशयात साठलेले होते. परंतु कालवा सल्लागार समितीच्या ढिसाळ कारभारामुळे व उजनी धरणाच्या खालील लोकप्रतिनिधींकडून बेकायदेशीर पणे पळवून नेण्याच्या आग्रहामुळे परिपूर्ण भरलेले धरण रिकामे होत असून दोन महिन्यात 50 टक्के पाणी संपलेले असून आज 21 फेब्रुवारी रोजी केवळ 61% साठा शिल्लक आहे. असेच नियोजन बाह्य पद्धतीने पाणी सोडत राहिल्यास लवकरच धरण वजा मधे प्रवेश करेल.
यामुळेच समांतर जलवाहिनी तात्काळ सुरू होणे काळाची गरज आहे. जलवाहिनी सुरू झाल्यास 25 ते 30 टी एम सी पाणी वाचेल. कारण नदीवाटे एका आवर्तनास सहा ते सात टी एम सी पाणी सोडावे लागते. अशी कमीत कमी डिसेंबर नंतर पाच आवर्तन सोडावी लागतात. सोलापूर शहराला पिण्यासाठी आख्ख्या वर्षाला केवळ अडीच ते तीन टी एम सी पाणी लागते. जलवाहिनी सुरू झाल्यास नदीवाटे वाया जाणारे पाणी वाचेल असे प्रा.शिवाजीराव बंडगर म्हणाले.
सोलापूर ला पिण्यासाठी औज बंधार्यात पाणी सोडायच्या नावाखाली नदीवाटे पाणी नेले जाते. जाणून बुजून समांतर जलवाहिनीचे काम रखडवले जात आहे.
● प्रा.शिवाजीराव बंडगर





