दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पुन्हा पाईप जाळले – १३ लाखांचे नुकसान

करमाळा(दि.९): दहिगाव उपसा सिंचन योजनेतील पाइप जळून अंदाजे 13 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मौजे कुंभेज (ता. करमाळा) येथे घडली आहे. याप्रकरणी नचिकेत दिलीप राजमाने (वय 29), रा. जेऊर, यांनी करमाळा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी नचिकेत राजमाने हे दि इंडियन हुम पाईप कंपनी लि. मध्ये साईट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या कंपनीचे काम दहिगाव उपसा सिंचन योजनेत सुरू असून, मौजे कुंभेज येथील उजवी वितरीका क्र. 6 या ठिकाणी 315 मिमी व्यासाचे ६६ एचडीपीई पाइप साठवून ठेवले होते. 8 मे रोजी काम बंद असल्याने साइटवर कोणीही नव्हते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेतकरी संतोष येळे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला फोन करून पाइप जळत असल्याची माहिती दिली.

त्यानंतर कंपनीचे कर्मचारी व स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, घटनास्थळी पाहणी केली असता 56 पाईप पूर्णतः जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे कंपनीचे अंदाजे 13 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही ज्वलनशील वस्तू नव्हती आणि आग लागण्यास कारणीभूत असणारी नैसर्गिक कारणे आढळून आली नाहीत. त्यामुळे हा प्रकार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक घडवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
करमाळा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दहिगाव योजनेचे पाईप दुसऱ्यांदा जाळले; राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोकोचा इशारा

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम डिसेंबर २०२३ पासून तालुक्यात सुरू आहे. याआधीही असाच प्रकार १५ फेब्रुवारी २०२५ च्या सायंकाळी सहा ते दि. १६ फेब्रुवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कुंभेज येथे घडला होता. त्यात सुमारे १५ लाख रुपयांचे पाईप जाळले होते. त्यानंतर देखील करमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आरोपीचा शोध लागला नाही. यानंतर दहीगाव सिंचन योजनेच्या काम थांबले होते. ते एप्रिल मध्ये पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर काल पुन्हा १३ लाखांचे पाईप दुसऱ्यांदा जाळण्यात आले. एकूण २८ लाखांचे नुकसान या प्रकारातून घडले आहे. यासंबंधी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. मागे गुन्हा दाखल केल्यानंतर देखील आरोपी मोकाटच असून पोलीस प्रशासनाच्या या कुचकामी धोरण विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून येत्या १६ मे रोजी अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी दिला आहे.

दोन वेळेस काम बंद पाडले, दोन वेळेस पाईप जाळले हे आता खूप झाले. आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दहिगाव योजनेमुळे क्रांतिकारक बदल होऊ लागलेला असताना विध्वंस प्रवृत्तीची मंडळी सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने हे विघातक कृत्य करत असून त्याचा आम्ही जाहीर निषेध म्हणून व दहिगाव योजनेचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी रास्ता रोको करत आहोत.
● आशिष गायकवाड, माजी सरपंच देवळाली


