आमच्या पिढीनं अनुभवलेल बालपण

आमच्या पिढीनं निर्मळ, गावरान, मुक्त, निरागस, खरखुर जगलेल बालपण, त्यावेळी केलेल्या करामती या लेखातून मांडल्या आहेत.
विहिरीवरच्या इंजिनमोटारीचा खटका पडला की पाटातनं खळाळून वाहणारं पाणी उताराला दगडी सांदीतून फेसाळत जायचं. बघायला मज्जा च मज्जा यायची. डेरेदार मोठ्या आंब्याखालून खळाळत पाणी केळीच्या वळचणीतून वावराकडं बागडत लांब जायचं. पपईच्या पानांची देठं शेंडा खुडून पाईपासारखी एकमेकांना जोडायची आणि काळ्या रानातल्या पाटाला फोडून चिखलात इकडून तिकडे पाणी जाईल अशी रोवायची.
त्या नळकांड्यांतून येणारं पाणी तोंड लावून प्यायचं… अहाहा!! अमृताचा आनंद. ऊन लागू नये म्हणून पपईच्या पानांची छत्री डोक्यावर धरायची. पिकलेली कवठं रानात खाली वाऱ्याने आपोआपच पडायची, पण हात दुखस्तोवर दगड मारून मारून पाडलेली गाभूळली कवठ खाण्यात येडा आनंद होता.

शेळीच्या नाहीतर कुत्र्याच्या शेपटाला दोरी आणि दोरीला फुटका पत्र्याचा डबा बांधून त्यांना पळवायचं आणि त्यांच्या मागे नाचत आपणही पळायचं. हापश्याच्या (कूपनलिका) दांड्यावर बसून हळूच खाली यायचं. म्हशीच्या पाठीवर बसून, कमरेला दोरी बांधून त्यामध्ये काठी तलवारीसारखी खोवून साऱ्या रानात आपण राजे असल्यासारखं मिरवायचं.
एकावर एक दगडं रचून नवरीसारखा बांध सजवायचा.
पिंपळपान किंवा तरवडीच्या देठाची साल काढून पिपाणी बनवायची. उंच लिंबाच्या झाडाला झोका बांधून उचंच उंच उडायचं, निसटला पाय की धापकन कडब्याच्या पाचटात आपटायचं. ना खरचटायचं ना हाड मोडायचं, स्प्रिंग सारखं पटकन उठून पुन्हा झोक्यावर बसायचं.
लाल लाल चिंचेची लिपस्टिक बुटूकानेच ओठांवर लावायची, हिरोईन म्हणून लचकत भिताडावर चढून कॅटवॉक करायचा. माकडांगत चुलीत भाजलेली कणसं खायची, वरून हरभऱ्याच्या डहाळ्याचा दणकाच करायचा. रताळी आणि गाजरं माती झाडून खायची. त्या कोवळ्या वाळकांना (कोवळी काकडी), शेदाडांना, मुग-चवळीच्या शेंगांना, उपटून वेलाच्या भुईमुगाच्या शेंगांना पोटभरून, मनभरून खायचं… आजच्या प्रोटिनयुक्त सुक्या मेव्याला त्या रानमेव्याची सर येत नाही.

शेणाने सारवलेल्या तुझ्या सारवणावर फुफुटयाची पांढरी पावलं उमटवायची आणि सोबत ओरडाही खायचा. बैलगाडीतून जाताना बैलांच्या मधल्या दांडयांवर बसायचं, खाली उतरून मातीतून उमटणाऱ्या चाकाच्या रेषेवरून तालात चालायचं. गायीच्या आचळांतून दूध काढताना दोन पायांवर बसून दुधाची धार डायरेक्ट तोंडात… नाकात.
बाभळीच्या काट्यामध्ये वाळलेल्या पानाच्या पट्टीला छिद्र करून पुढे शेळीच्या लेंडीचा शिपाई बसवून गरगर भिंगरी करायची आणि त्या वाऱ्यासोबत गुणगुणणार्या आवाजाला आपल्या आवाजाचं संगीत द्यायचं… टूर्रर्रर्रर्र.

पाडाचा आंबा झाडावरच बसून खाण्याची मजाच न्यारी.
पाटाच्या पाण्यात पालथं पडून चिखल-पाण्याच्या उन्हातल्या अभ्यंगस्नानाला जगात तोड नाही. आम्ही जगलो स्वच्छंद, मातीच्या मातकट सुगंधी वासातून, ढेकळांच्या मुरलेल्या उबदार शेतांतून…. आमची पिढी खरंच भाग्यवान ठरली.
आज घड्याळाच्या काट्यांवर पळताना पोल्युशनच्या दुनियेत व केमिकल आणि खतांच्या अतिरेकाने तो गावरान तुरटपणा, कच्चा पण सशक्त गोडवा अस्तित्वहीन झालाय!
✍️रेश्मा दास, मो.९८८१०५५९९८



