नामदेवराव जगताप यांच्या मुळेच जिल्हयात हरितक्रांती आली – ॲड. वीर

करमाळा (दि.१०) : माजी आमदार नामदेवराव जगताप यांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या अथक परिश्रमामुळेच आज जिल्हयात हरितक्रांती झाल्याचे प्रतिपादन करमाळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर यांनी केले. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार नामदेवराव जगताप यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
करमाळा बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामधे देशभक्त माजी आमदार नामदेवराव जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन बाजार समितीचे संचालक तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच मार्केट कमिटीच्या कार्यालयीन इमारतीसमोरील देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास करमाळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष ॲड कमलाकर वीर व बाजार समितीचे संचालक मनोज पितळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
पुढे बोलताना ॲड. वीर म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यातील व उजनी धरणाच्या निर्मितीतील स्व .जगताप यांचे योगदान, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची स्थापना, महात्मा गांधी विद्यालयाचा विस्तार, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, छत्रपती शिवाजी वसतीगृहाची उभारणी, कॉटेज हॉस्पिटलची उभारणी, डीसीसी बँकेच्या माध्यमातून केलेले अर्थसाहाय्य, एसटी महामंडळाचे माध्यमातून केलेले काम तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व विधानसभा सदस्यपदी केलेल्या ठोस कार्याचा व हजारो बेरोजगार तरुणांना दिलेल्या नोकऱ्या आदी बाबींचा आढावा याप्रसंगी ॲड वीर यांनी आपल्या मनोगतातून घेत स्व . जगताप यांच्या कार्याचे स्मरण व कृतार्थता व्यक्त केली.
या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक हनुमंत ढेरे, बाजार समितीचे माजी संचालक मयूर जोशी ,माजी सचिव दत्तात्रेय क्षिरसागर, सचिव विठ्ठल क्षिरसागर, सहाय्यक सचिव रविंद्र उकिरडे ,व्यापारी प्रीतम लुंकड , राजेंद्र चिवटे, तालुका गटसचिव पतसंस्थेचे चेअरमन अनिल सुरवसे ,जिल्हा बँकेचे बँक इन्स्पेक्टर नगरे यांचे सह व्यापारी, कर्मचारी, शेतकरी, गटसचिव आदी उपस्थित होते .




