‘मागेल त्याला सोलर पंप’ योजनेमुळे नवीन वीज कनेक्शनला महावितरण कडून आडकाठी

0

करमाळा(दि.८): सध्या सुरू असलेल्या “मागेल त्याला सोलर पंप” या कृषी धोरणामुळे महावितरणकडून शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देणे बंद केले आहे. नवीन वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले असल्याचे निवेदन संभाजी ब्रिगेडने महावितरणला दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उजनी धरण व तलाव क्षेत्रात सौर पॅनेल बसवणे अशक्य असून, विद्युत पंपासाठी आवश्यक जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे हे धोरण शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारे ठरत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून धरण व तलावाच्या पाणलोट क्षेत्रातून पाईपलाइन टाकल्या आहेत. वीज कनेक्शनसाठी स्वखर्चाने डीपी उभारण्यास ते तयार असले तरी महावितरणकडून परवानगी दिली जात नाही.

सध्या अस्तित्वात असलेल्या ट्रान्स्फॉर्मरवर दाब वाढल्याने वारंवार बिघाड होत आहे. शेतकरी स्वतःच्या खर्चाने अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर बसवण्यास तयार असतानाही शासनाने परवानग्या बंद केल्याचे सांगितले जात आहे. नवीन वीज कनेक्शनही थांबवण्यात आले असून कोटेशन भरून घेतले जात नाहीत. परिणामी पाणी असूनही शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात वाया जात आहे.

ही स्थिती अत्यंत गंभीर असून तातडीने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्यावतीने जेऊर येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयात शशिकांत लोंढे व दिग्विजय जाधव यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व महावितरणचे कार्यकारी अभियंता बार्शी यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष नितीन खटके, सुहास पोळ, शहराध्यक्ष अतुल निर्मळ, आदिनाथ माने, वैभव मोहिते, सोमनाथ जाधव व उमेश मोहिते उपस्थित होते.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!