बेजबाबदारपणे होणाऱ्या ऊस वाहतुकीवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 'हवा सोड' आंदोलनाचा इशारा.. - Saptahik Sandesh

बेजबाबदारपणे होणाऱ्या ऊस वाहतुकीवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ‘हवा सोड’ आंदोलनाचा इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील श्रीदेवीचामाळ, रोशेवाडी, मौलालीनगर या ठिकाणांहून बेजबाबदारपणे होणाऱ्या ऊस वाहतुकीवर कारवाई करणेबाबत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले आहे, तसेच या बेजबाबदारपणे होणाऱ्या ऊस वाहतुकीवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ‘हवा सोड’ आंदोलन करण्यात येईल.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या साखर कारखाने चालू झालेले असून, कारखान्यांपर्यंत ऊस वाहतूक होत आहे. सदर वाहतूक ट्रॅक्टरद्वारे होत असून करमाळा शहराच्या चारही दिशेला असलेल्या श्रीदेवीचामाळ, रोशेवाडी व करमाळा शहरातील मौलाली नगर येथून जोरदार व बेजाबदार तसेच अतिरिक्त लोड घेऊन वाहतूक होत आहे.

या घटनेकडे कोणाचेही लक्ष नाही, बेजबाबदारपणे ऊस वाहतूक करत असताना रस्त्याच्या मधोमध उताराच्या दिशेला ऊसाने भरलेली ट्रॉली सोडून चालक निघून जातात. व रस्त्यामध्ये मोठ-मोठे दगड (उटया) आहे त्याच परिस्थितीमध्ये ठेऊन देतात, त्यामुळे रात्रीच्या वेळी समोरुन एखादे वाहन समोर आल्यास त्या टॅक्टरवर / ट्रॉलीवर रिफ्लेक्टर व इंडिकेटर्स नसल्याने मोठे अपघात होतात.

कधी-कधी अल्पवयीन मुले देखील ट्रॅक्टर चालवताना आढळून येत असतात. त्यामुळे अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला आपला प्राण गमवावा लागतो. तसेच रात्री व दिवसा मोठ्या आवाजात टेपचा आवाज करतात. मागून आलेल्या गाड्यांना मोठ्या आवाजामुळे हॉर्न चा आवाज दिला तरी त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. त्याच बरोबर सदर ट्रॅक्टर्स च्या ट्रॉलींनादेखील नंबर नसतात अशातच कोणी अपघातात मरण पावल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होतो. सदरील ट्रॅक्टरवर पोलीस कारवाई करण्यास गेल्यास त्यावर राजकीय प्रतिनिधी त्यांच्यावर कारवाई होऊ देत नाहीत. या वाहनांवर कारवाई न केल्यास, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने हवा सोड आंदोलन करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!