गौतमचंद लुंकड : एक संयमी व्यक्तिमत्व

जेऊर येथील ज्येष्ठ व आदरणीय व्यापारी गौतमचंद उत्तमचंद लुंकड (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शांत, संयमी व सदाचारी आयुष्य जगून, परमार्थाचा ध्यास घेत ते स्वर्गवासी झाले.त्यांच्या निधनाने एक सौम्य, समंजस आणि समाजाशी नाते सांगणारी व्यक्ती हरपली आहे.

गौतमचंदजी हे जुन्या पिढीतील व्यापारी होते, जे फक्त व्यवसायापुरतेच मर्यादित नव्हते, तर माणुसकी, आपुलकी, आणि सुसंवाद यांच्या मूल्यांना त्यांनी नेहमी अग्रक्रम दिला. त्यांचा स्वभाव नेहमी शांत, संयमी आणि मदतीस तत्पर असायचा.
त्यांच्या जाण्याने समाजाने एक सज्जन, समंजस, धर्मनिष्ठ, व अतिशय मृदुभाषी व्यापारी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांचा जीवनप्रवास हा ‘अहिंसा, सत्य, संयम आणि सेवा’ या जैन मूल्यांवर आधारीत होता.व्यापार क्षेत्रातील त्यांचा अनुभव, दूरदृष्टी आणि प्रामाणिकपणा यामुळे ते अनेक व्यापाऱ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ठरले होते.

त्यांचा व्यापारी, सामाजिक आणि जैन समाजाच्या वर्तुळात विशेष दबदबा होता. त्यांनी आपल्या व्यवहारातून केवळ संपत्तीच नव्हे तर माणसे जोडली. समाजात त्यांना ‘भावसा’ या नावाने प्रेमाने ओळखले जायचे. कापड व्यापारी अभयराज लुंकड, स्टेशनरी व्यापारी भूषण शेठ लुंकड, तसेच पुण्यातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. वैभव लुंकड यांचे ते वडील होत. अभयराज व भूषण शेठ या दोघांना करमाळा परिसरात अत्यंत आदराने पाहिले जाते. त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवला आहे.डाॅ. वैभव लुंकड यांची पुणे येथे समाजातील व सर्वसामान्यांचा डॉक्टर म्हणून ओळख आहे.

गौतमचंदजींच्या जाण्याने समाजातील एक आपुलकीचा, माणुसकीचा हात कायमचा गमावला आहे. ते शांत, सुसंस्कृत आणि कुटुंबवत्सल होते.त्यांना सर्वच समाजघटकांमध्ये आदराचे स्थान होते. त्यांच्या पवित्र आठवणी आणि जीवनमूल्ये आमच्यासाठी सदैव दीपस्तंभ राहतील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
✍️डॉ.अॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०





