लोकनेते स्व.सुभाष (आण्णा) सावंत – करमाळा तालुक्यातील एक दिपस्तंभ..!

0

ज्यांनी गेली ५० वर्षे जनसेवा केली, गोरगरीब, कष्टकरी, हमाल, तोलार, फेरीवाले, व्यापारी यांना काळजाप्रमाणे सांभाळले, सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण केलं, संस्कृती जोपासली, संकटांना न डगमगता लढले, सर्व जातीधर्मीयांना सोबत घेतलं, गेली पाच दशक करमाळा शहर व तालुक्याच्या जडणघडणीत महत्वपूर्ण सहभाग असणारे, अन्याय विरूद्ध लढणारे, जनायक योद्धे आदरणीय स्वर्गीय सुभाष (आण्णा) सावंत यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!


आण्णांचा जन्म  १ मे १९५२  रोजी करमाळा येथील सावंत कुटुंबात झाला. यावेळी आण्णांचे वडील स्व. अनंतराव ( आबा ) सावंत हे हमाल म्हणून काम करत होते. छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजे, महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, डाॅ. बाबा आढाव अशा आत्मविश्वासाने रसरसलेल्या महापुरुषांचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणणारे स्व. सुभाष आण्णा सावंत यांनी उभारलेले सामाजिक काम खरोखरच अतुलनीय आहे.


करमाळ्यातील प्रतिष्टीत घराण्यांपैकी सावंत हे एक कुटुंब आहे. माजी नगराध्यक्ष स्व. डी के सावंत यांचा वारसा असलेले आणि स्वर्गीय सुभाष (आण्णा) तर सावंत हे या कुटुंबातील प्रसिद्ध व कोणत्याही सामाजिक चळवळीचे  केंद्रबिंदू असलेले आदरनिय व्यक्तिमत्त्व होते.
सर्वसामान्य नागरिकास काही अडचण किंवा समस्या आली की लगेच त्या समस्येचे निराकरण किंवा अडचणीचे उत्तर म्हणजे फक्त सुभाष (आण्णा) सावंत…. समाजातील उपेक्षित घटकांना हक्क व  न्याय मिळवून देण्यासाठी आण्णानां प्रस्थापित व सामर्थशाली राजकीय शक्तीविरुद्ध लढा द्यावा लागला. ज्या प्रमाणे बोलणार त्याप्रमाणे कृती करून दाखवणार हा  यांचा स्वभावातील मोठा गुण होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी तरुणांचे संघटन करून सावंत गल्ली येथे छत्रपती शिवाजी तरुण मंडळाला नेहमी एकसंघ ठेवून नेहमी मार्गदर्शन केले, तसेच तेथील हनुमान मंदिरासाठी मंदिरामध्ये भजन कीर्तन, पारायणे हरिनाम, सप्ताह, दिंडी असे सामाजिक धार्मिक कार्यक्रम घडवून आणले.


तसेच हनुमान व्यायाम शाळेची स्थापना केली व 1981 साली हमाल पंचायतीची स्थापना करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता हमाल कामगार कष्टकऱ्यांसाठी 1993 साली डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाने व मदतीने कामगारांसाठी माथाडी मंडळा ची अंमलबजावणी करत त्यांना त्यातून बोनस, प्रॉव्हिडंट फ़ंड, ग्रॅच्युटी, उपदान असे फायदे मिळवून दिले. या मागणीसाठी सन 1992 – 93 साली दिड महिना संप करणे भाग पडले तसेच दिडशे हमालां समवेत आण्णांनी येरवडा जेल भोगले. यावेळी माझे वडील कुंडलिक सुरवसे सुध्दा आण्णां सोबत होते. तसेच 100 किलो पोत्यामुळे हमालांचे पाय गुडघे, मणके बाद होऊन तो कायमस्वरूपी घरी बसतो त्यामुळे त्याच्या घरादाराची उपासमार होते ती होऊ नये म्हणून 100 किलो ऐवजी 50 किलोचे पोते असावे अशी मागणी करून त्यास यश मिळवून दिले.


     आदिनाथ सहकार साखर कारखाना उभारणीत आण्णांचा खूप मोलाचा वाटा होता. याच कारखान्यात सत्ताधारी संचालकाची भूमिका बजावत असताना सभासद व कामगार यांना न्याय मिळवून दिला. भ्रष्टाचाराची असणारी चीड  आणि गोरगरिबांची असणारी जाणीव या भूमिकेतून त्यांना भ्रष्टाचार विरुद्ध तीव्र आंदोलने उभी करावी लागली एवढेच नाही तर ती यशस्वी करून दाखवली, कारखान्यातील पेट्रोल पंपावरील जास्त दराने होणारी विक्री उघड करून आंदोल उभे केले व यशस्वी केले. नगरपालिकेने केलेल्या अतिक्रमण हटाव योजनेमध्ये विस्थापित झालेले, टपरीधारक, हॉटेल मालक, विक्रेते याना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी आंदोलन करुन नगरपरिषद व कृषी उत्पन्न बाजासमिती मध्ये गाळे बांधायला भाग पडून त्यांचे पुनर्वसन केले.


         हुजरेगिरी करून मिळवणाऱ्या पदा पेक्षा संघर्ष करत लढणारा कार्यकर्ता हे पद महत्वाचे असते असे आण्णांचे ठाम मत होते, राजकारणात येणारे लोक पैसा,  वंशपरंपरा व कोणाच्या तरी आधारावर सत्तेत येतात पण आण्णांचे तसे नव्हते, स्वतःच्या मेहनतीवर व जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर 35 वर्ष त्यांची राजकीय कारकीर्द फुलत गेली, आपल्या बरोबर असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यास चाळणी कामगार, हमाल ते बाजार समिती चे संचालक व नगरसेवक आणि नगराध्यक्ष या पदापर्यंत नेले. यामध्ये राजू आव्हाड, विठ्ठल रासकर व वालचंद रोडगे, मनोज गोडसे, ज्ञानेश्वर मोरे, हज्जूभई तांबोळी, तसेच अशपाक सय्यद, अल्लाफ तांबोळी अशी नावे आपल्याला घेता येतील. तसेच अनेकांना  आमदार,  मंत्रिपद, काहींना साखर कारखान्याचे संचालक , चेअरमन आणि पंचायत समिती सभापती केले होते.


        फणसा अंगी काटे, आत अमृताचे रसाळ गरे, अशाप्रकारे कडक स्वभाव, भ्रष्टाचारा विरुद्ध चीड, अन्यायाविरुद्ध बंड, व स्पष्टवक्तेपणा यामुळे त्यांना राजकारणात अनेक शत्रू निर्माण झाले पण त्याची तमा न बाळगता करमाळा शहराच्या व तालुक्याच्या राजकारणात गेली 35 वर्षे एक महत्त्वाचे घटक व दीपस्तंभ म्हणून  राहिले, तालुक्याचा स्वाभिमान कसा जतन करावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत होते. म्हणजेच सर्वसामान्य कार्यकर्ता, कारखान्याचे संचालक, हमालपंचायत चे संस्थापक अध्यक्ष, जिल्हापरिषद सदस्य ते कामगार नेता हा राजकीय प्रवास अतिशय खडतर, संघर्षाशील  व प्रमाणिकपणाचा होता.


       तसेच गोरगरीब जनतेच्या दबलेल्या आवाजाला साथ देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच स्व. सुभाष (आण्णा) सावंत. आण्णांनी करमाळ्याच्या राजकारणात एक वेगळे वलय प्राप्त करून सत्यवचन आणि निस्वार्थी राजकारणाचा नियम घालून दिला आहे गोरगरिबांचे कैवारी म्हणून आण्णांना संबोधले जाते . सर्वसामान्यांच्या  प्रश्नांमुळे आण्णांनी अनेक आंदोलने केली त्यांना न्याय मिळवून दिला त्यामुळे तालुक्यातच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आण्णां चे नाव आहे. या काळात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे , आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, कामगार नेते डॉ. बाबा आढाव, तसेच तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या संपर्कात आण्णा आले. राजकारणात त्यांनी सत्यासाठी संघर्ष केला वेळप्रसंगी आंदोलन केली . हाच सुसंस्कृत पणा पुढे त्यांचे सुपुत्र ॲड. राहुल ( भाऊ ) सावंत व सावंत कुटुंब यांनी जपला आहे. असा समृद्ध आणि चळवळीचा वारसा असलेल्या घराण्यातील ॲड. राहुल ( भाऊ ) सावंत, संजय (पप्पू ) सावंत, सुनील ( बापू ) सावंत व सर्व सावंत कुटुंबीय हे मार्गदर्शक विठ्ठल आप्पा सावंत यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सर्वसामान्य लोकांसाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वारसा जपत असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्यक्ष लढा देत आहेत, अशा या
१ मे रोजी असलेल्या करमाळा तालुक्यातील एक दीपस्तंभ कै. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस मन:पुर्वक अभिवादन..!

✍️प्रा.डॉ. दिपक सुरवसे, माजी सरपंच,भोसे ग्रामपंचायत ता. करमाळा
          

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!