दिग्विजय बागल मारहाण प्रकरणात जगताप गटाला दिलासा - माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह सहा जणांची निर्दोष मुक्तता - Saptahik Sandesh

दिग्विजय बागल मारहाण प्रकरणात जगताप गटाला दिलासा – माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह सहा जणांची निर्दोष मुक्तता

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा, (ता.२) : मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व सध्याचे बाजार समिती सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, घातक हत्याराने मारणे या व इतर कलमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या कलमातून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह सात जणांना बार्शीचे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. सी.जगदाळे यांनी दोषमुक्त केले आहे.

यात हकीकत अशी, की.. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत सचिन चांदगुडे याने जखमी शिवाजीराव बंडगर यांना आमच्या पार्टीतून का गेला.. असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. त्यावेळी दिग्विजय बागल हे सोडविण्यास आले असता, माजी आमदार जयवंतराव जगताप व अन्य जणांनी शिवाजीराव बंडगर यांना मारहाण केली. तर जयवंतराव जगताप यांनी रिव्हॉल्वर काढून, गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच रिव्हॉल्वरने दिग्विजय बागल यांच्या नाकावर ठोसा मारून जखमी केले.

तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामकाजात अडथळा केला.. या आशयाची फिर्याद दिग्विजय बागल यांनी करमाळा पोलीसात दिली होती. त्यामुळे श्री. जगताप यांच्यासह सहा जणाविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक हत्याराने मारणे, सरकारी कामात अडथळा आणणे या व इतर कलमान्वये दाखल झाला होता. यावर करमाळा पोलीसांनी तपास करून आरोपी विरूध्द बार्शी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. त्यानंतर यातील आरोपींनी ॲड. मिलींद थोबडे यांच्या मार्फत वरील कलमातून दोषमुक्त करण्याचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीवेळी ॲड.थोबडे यांनी युक्तीवाद केला.

त्या युक्तीवादामध्ये रिव्हॉल्वरने नाकावर मारणे म्हणजे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असे होत नाही. केवळ घातक हत्याऱ्याने मारल्याचे कलम लागू होईल. असे सांगून दोषारोपपत्राचे अवलोकन केले असता, सरकारी कामात अडथळा केल्याचे कलम लागू होत नाही. असा युक्तीवाद केला. त्या पुष्ठर्थ उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले.

न्यायालयाने ते ग्राह्य धरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणण्याच्या कलमातून माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, वैभवराजे जगताप, बबन चांदगुडे, जयराज चिवटे, विकी फंड, शिवराज चिवटे यांना दोषमुक्त केले आहे. तसेच सदरचा खटला हा सत्र न्यायालयातून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, करमाळा यांच्या न्यायालयाकडे इतर कमलांतर्गत चालविण्यासाठी वर्ग करण्यात आला आहे. या खटल्यात अर्जदारा तर्फे ॲड. मिलींद थोबडे, ॲड. कमलाकर वीर, ॲड. निखिल पाटील, अभिजित इटकर यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे विशेष सरकारी वकील ॲड.राज पाटील यांनी काम पाहिले. या निर्णयाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह सहा जणांना दिलासा मिळाला असून, जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!