गोष्ट एका जिद्दी माणसाची... - Saptahik Sandesh

गोष्ट एका जिद्दी माणसाची…

अमई महालिंगा नाईक

कर्नाटकमधील ७२ वर्षाच्या अमई महालिंगा नाईक या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला शेतात उभारलेल्या सिंचन व्यवस्थेबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. खरंतर पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि ‘अमई महालिंगा नाईक’ या नावाची सर्वाधिक शोध मोहीम सुरू झाली. मुळात हे नाव आतापर्यंत कुणालाही ठाऊक नव्हते. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल जास्त लेखन नाही आणि गूगल वर माहिती सुद्धा उपलब्ध नव्हती हेच विद्यमान केंद्र सरकारचे वेगळेपण आवडून गेले आणि याबाबत कितीही कौतुक केले तरी थोडेच आहे.

कर्नाटकमधील आडनदीकाठापासून जवळचं एक छोटं खेडेगाव केपु. गावातील एका श्रीमंत शेतकऱ्याकडे एक शेतमजूर काम कारायचा. त्यांच्या नारळ आणि सुपारीच्या बागेत हे गृहस्थ मजूर म्हणून ईमानदारीने काबाडकष्ट करत होते. त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी त्या शेतमजूराला आपल्या डोंगरावरील पडीक पडलेला शेताचा तुकडा बक्षीस म्हणून दिला. पण त्या माळरानावर पाण्याचा मोठा प्रश्न होता. तरीही यांच्या सारख्या अवलियाने तिथे सुपारीची बाग लावण्याचं स्वप्न बघितलं आणि तिथूनंच संघर्षाचा प्रवास सुरु झाला. बघितलेलं स्वप्न सत्यात उतरवणे तसे कठीण आहे पण अमई महालिंगा नाईक हे नाव आज टनेल मॅन म्हणून जगप्रसिद्ध झाले आहे कारण त्यांनी जे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

साधारण १९७८ सालातील ही घटना आहे. श्री. अमई महालिंगा नाईक यांना शेताचा तुकडा मिळाला होता पण शेतात आणि त्या माळरानावर पाण्याचा प्रश्न आ वासून त्यांच्या समोर उभा होता. आपल्यापैकी एखादा त्यांच्या जागी असता तर हा शेतीचा नाद कधीच सोडून दिला असता, पण म्हणतात ना ‘कोशिश करने वालों की कभी हार नही होतीं’ याप्रमाणे त्यांनी हार न मानता काम चालू ठेवलं. त्यांनी त्या माळरानावर राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी बांधली. तेथील जमीन सपाट करून घेतली. जमीन डोंगराच्या पायथ्याशी असल्याने त्यांनी पावसाचे पाणी अडवण्यासाठी चर खोदायला सुरुवात केली. हे सगळं होत असतानाच मालकाच्या शेतातील काम सुरुच होतं. दिवसभर मालकाच्या शेतात काम करायचं आणि काम संपलं की चर खोदण्याचं काम करणं हे त्यांचे रोजच्या परिपाठाप्रमाणे सुरु होते. हे काम रोज रात्री ९ वाजेपर्यंत चालायचं. अमई महालिंगा नाईक माळरानावर जाताना कापसाच्या वाती आणि रॉकेलची चिमणी घेऊन जायचे. असं करत करत त्यांनी पहिला बोगदा २० मीटरपर्यंत खोदल्यानंतर तो कोसळला. तब्बल २ वर्षे खोदण्याचं काम करुनही त्यांच्या हाताला काहीच मिळालं नाही. त्यानंतर सलग सहा वर्षात असे ४ बोगदे कोसळल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही. मग त्यांच्या नंतरच्या बोगद्याने त्यांच्यापुढे हार मानली आणि तब्बल ३० फूट खोदल्यानंतर बोगद्याला पाणी लागले परंतु ते पाणी शेतापर्यंत आणण्याचं आव्हान होतंच. मग त्यांनी एक शक्क लढवली आणि सुपारीच्या खोडाचा पाईपसारखा वापर करुन बोगद्यातील पाणी शेतापर्यंत आणलं आणि तिथे पाणी साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला.

सुमारे आठ वर्षातील तेवीस हजार तासांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं होतं. या आठ वर्षात त्यांना अनेक लोकांनी नाव ठेवले, पण त्यांनी या बोलण्याकडे लक्ष न देता आपलं काम केलं आणि यामुळे त्यांच्या ओसाड माळरानावर सोनं पिकवण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात सुपारी, नारळाची आणि काजूची झाडे लावली. हौदातील साठवलेलं पाणी शेतासाठी पुरत होतं. हाच जिद्दी, मेहनती आणि पाण्याचा मागमूस नसलेल्या ओसाड माळरानावर सोनं पिकवून दाखवणारे शेतकरी म्हणजेच पद्मश्री अलंकृत अमई महालिंगा नाईक आहे. याच जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शेतात आज ३०० पेक्षा जास्त सुपारीची, ७५ नारळाची झाडे, १५० काजूची झाडे, २०० केळीची आणि काही मिरचीची झाडं आहेत. खोदलेल्या बोगद्याच्या साहाय्याने त्यांनी शेतीसाठी एक नवी सिंचन व्यवस्था शोधून काढलीय. म्हणून जगभर त्यांची ‘टनेल मॅन’ म्हणून ओळख निर्माण झालीय. अमई महालिंगा नाईक यांनी जिद्दीने शेतकऱ्यांसमोर आपल्या कामातून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांचं वय ७३ वर्षे इतकं आहे. आजही अमई महालिंगा नाईक स्वत: शेतातली सगळी कामं करतात आणि सगळी शेती सेंद्रीय पद्धतीने करतात हे विशेष आहे.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमधील पुरस्कार सोहळ्यात त्यांना कृषी क्षेत्रातला पद्मश्री मिळाला. शिक्षण, तंत्रज्ञान, पैसा यांपैकी काहीच जवळ नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात हे त्यांनी साध्य करून दाखवले आहे. आजच्या काळातील तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही शेतीकडे दुय्यम दृष्टीकोनातून बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘अमई महालिंगा नाईक’ हे एक उत्तम उदाहरण आहेत. कृषिप्रधान असणारा आपला देश ‘अमई महालिंगा नाईक’ यांच्यासारख्या कष्ट करणाऱ्या लोकांमुळे अधिक श्रीमंत होतो आहे. पद्मश्री ‘अमई महालिंगा नाईक’ यांच्या कार्याला नमन आहे. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतांना कवी.बा.भ.बोरकर यांच्या ‘लावण्य रेखा’ या कवितेतील ओळी स्मरणात येत आहेत.

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे!
_______________________

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!