
केम(प्रतिनिधी):उमरड येथे गतिरोधक उभारण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी १५ ऑगस्ट रोजी उमरड येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने उमरड येथे मागणी केलेल्या सर्व ठिकाणी गतिरोधक उभारले.

गतिरोधक उभारणीचे काम १४ ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, या ठिकाणी होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उमरड येथे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधकांची आवश्यकता असल्याबाबत राजाभाऊ कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पत्रव्यवहार केला होता. मात्र, मागणीची दखल घेतली जात नसल्याने अखेर १५ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला होता.

आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने उमरड येथे मागणी केलेल्या ठिकाणी गतिरोधक उभारल्याने राजाभाऊ कदम यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. विभागाने केलेल्या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


